सरकारने पत्रकारिता हा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू – संदीप काळे यांचा इशारा

Spread the love

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी

मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ – ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडले. राज्यभरातून तब्बल दोन हजारांहून अधिक पत्रकारांनी उपस्थित राहून दोन दिवसीय अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सुदृढ पत्रकारितेसाठी एकूण १५ ठराव अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले. हे सर्व ठराव राज्य सरकारने तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील, असा तीव्र इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला.

अधिवेशनात पत्रकारांचे किमान वेतन शासनाने निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी, पत्रकार सुरक्षा कायदा अधिक कडक करावा आणि जिल्हा-तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नेमावेत, अशा मागण्यांना प्राधान्य देण्यात आले. सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी १० लाखांचा आरोग्य विमा आणि २५ लाखांचा अपघात विमा अनिवार्य करावा, पत्रकार निवृत्तीवेतन योजना लागू करावी आणि सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये पत्रकारांसाठी २% राखीव कोटा देण्यात यावा, असे ठरावही संमत करण्यात आले. जिल्ह्यातील प्रेस-क्लबांचे आधुनिकीकरण, माहिती खात्यात ‘मीडिया सपोर्ट सेल’ स्थापन करणे, राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण अकादमी उभारणे, पत्रकार अधिवेशनांना सरकारी आर्थिक सहाय्य, न्यूज-पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि पत्रकारांवरील खोटे खटले मागे घेण्यासाठी विशेष समिती स्थापणे, या ठरावांनाही व्यापक पाठिंबा मिळाला.

आपत्तीग्रस्त पत्रकारांसाठी तात्काळ मदत निधी, महिला पत्रकारांसाठी सुरक्षित निवास, प्रवास भत्ता, मातृत्व रजा, क्रेच सुविधा आणि लैंगिक छळ प्रतिबंधासाठी कडक यंत्रणा लागू करावी, असा ठरावही अधिवेशनात मंजूर करण्यात आला. तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विशेष पत्रकार सन्मान व गौरव योजना सुरू करण्याचाही ठराव एकमुखी पारित झाला.

अधिवेशनात पारित केलेले सर्व १५ ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळाला प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. तसेच सर्व पालकमंत्र्यांनाही स्थानिक पातळीवर भेटून मागण्यांचे स्मरण करून देण्यात येईल. सरकारने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सर्व राज्य पदाधिकारी, सर्व राज्य कोर टीम यांनी दिला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *